समाजात फूट पाडण्याचा हा भाजपचा डाव   

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्ला

मुंबई : राज्याचा मुख्यमंत्री नागपूरचा, गृहखाते सुद्धा त्यांच्याकडे, तरीही नागपूरमध्ये जातीय दंगल होते. मग गुप्तचर यंत्रणा काय झोपल्या होत्या का? असा संतप्त व परखड सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर दंगलप्रश्नावर बोलताना सरकारला विचारला. मी विरोधक म्हणून नाही, तर या राज्याचा सामान्य नागरिक म्हणून बोलत असल्याचे स्पष्टीकरणही यांनी केले.
 
नागपूरच्या घटनेवरुन दिसून येते की, राज्यात प्रशासनावर आणि गृहखात्यावर सरकारचा वचक राहिलेला नाही. ज्या पद्धतीने वातावरण बिघडवले जात आहे, ते अतिशय गंभीर आहे. समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे आणि सरकारच यामागे असल्याचा स्पष्ट संदेश यातून मिळतो, असा थेट आरोपच त्यांनी केला.
 
अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. यावरून सरकारचा उद्देश स्पष्ट होतो. समाजात तणाव निर्माण करणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, असे सांगत दानवे यांनी थेट भाजपवर टीकास्त्र सोडले.
 
भाजप, बजरंग दल, विहिंप, संघटनेतील लोकांच्या वक्तव्यावरूनही हेच दिसून येत आहे की, समाजात फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे. असाही आरोप दानवे यांनी केला. त्याचवेळी हे थांबवायचे असेल तर सरकारने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 

Related Articles